राज्यात त्रिभाषा सूत्र लागू केल्यापासून गदीरोळ उठला होता. सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षानं कडाडून विरोध केला. ठाकरे बंधूंनी याप्रकरणी एकत्र येत हिंदीविरोधात मोर्चाची घोषणा केली होती. येत्या ५ जुलै रोजी मुंबईत हा मोर्चा निघणार होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत हिंदीबाबतचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर रद्द केला आहे.
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावे की नाही यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती माशेलकर समितीचा अभ्यास करणार आणि त्यावर शिफारशी करणार आहे. त्यानंतर राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारच्या याच निर्णयाविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईत एकत्रित मोर्चा काढणार होते. मात्र आता हा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु 5 जुलैचा मोर्चा जरी रद्द करण्यात आला, तरी दोन्ही पक्ष विजयी मेळावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे, म्हणजेच त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केले जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मोर्चा आणि जल्लोष करणार आहेत. 5 तारखेला विजयी मेळावा होईल, त्या मेळाव्यात ही कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.