महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या निवडणुकात वाढीव मतदान झाल्याचा आरोप केला जात होता. याचप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आता यासंबंधी न्यायालयानं निकाल दिला असून ही याचिका फेटाळून लावली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशीच्या वाढीव मतदानावर आक्षेप घेतला होता. संध्याकाळी सहानंतर 75 लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत संध्याकाळी सहानंतर 75 लाखांहून अधिक मतदान झाले असा दावा करत राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर जाहीर झालेले निवडणूक निकाल रद्द करावेत अशी मागणी अहिरे यांनी न्यायालयाकडे केली होती. 90 पेक्षा जास्त विधानसभा जागांवर टाकलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यात प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली होती.
याप्रकरणी न्यायाधीश जी.एस. कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने, ‘या याचिकेत कोणताही ठोस आधार नाही. अशा परिस्थितीत आम्ही ती फेटाळतो’ असा निर्णय दिला. ‘मतदान प्रक्रियेत लबाडी, गैरप्रकार झाल्याचे दाखवणारे याचिकेत काहीच नाही. त्यामुळे अशी याचिका करून याचिकाकर्त्याने न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवला. त्यामुळे खरे तर दंडासहित याचिका फेटाळायला हवी. परंतु, दंड लावणे आम्ही टाळत आहोत’, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात नमूद केले. शिवाय याचिकेत केलेले दावे हे निराशेतून केलेले असून ते हास्यास्पद असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली आहे.